Sunday, August 21, 2022

Literature Fest आणि झटपट कविता

            पहिलं बक्षीस मिळाल्यानंतर माझ्यासोबत घरच्यांनाही असं वाटू लागलं की, मी अशाच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत रहावं. काही महिन्यात नवी संधी चालून आली. दिव्य मराठी लिटरेचर फेस्ट चे आयोजन करण्यात आले होते. त्यातील बालकवी संमेलनात बालकवींना त्यांच्या कविता सादर करता याव्यात हा त्यामागचा उद्देश होता.

            मी माझी पहिली कविताच वाचायचं ठरवलं. त्याहून चांगली कोणतीच कविता माझ्याकडे नव्हती. त्या कवितेला बक्षीस मिळाल्याने तिला एक वेगळा दर्जा (माझ्यामते)  प्राप्त झाला होता.

           कार्यक्रम सुरू झाला. प्रत्येकाने येऊन आपली कविता सादर केली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे कविता वाचन झाले. यापुढे खरी गंमत सुरू झाली. आयोजकांनी ऐन वेळेवर कविता स्पर्धा आणि निबंध स्पर्धा घेण्याचं ठरवलं. लहान व मोठा असे दोन वयोगट केले. आणि निबंध स्पर्धेचे 3 आणि कविता स्पर्धेचे 3 असे विषय सांगितले. तुम्हाला असं वाटेल की, मी खूप घाबरली असेल, पण असं काहीच झालं नाही. मला त्यांचा हा twist खूप आवडला होता. नवीन चॅलेंज असल्यामुळे मी खूप उत्साही होते. पण तो उत्साह खूप काळ टिकला नाही.😞 त्यांनी सगळ्यात महत्त्वाची सूचना केली. "कविता व निबंध लिहिण्यासाठी केवळ 15 मिनिटे वेळ दिलेली आहे."  इतक्या कमी वेळात कविता करणं म्हणजे मोठं दिव्यच काम होतं! पण कविता तर लिहायचीच होती, म्हणून मी सगळ्यात सोपा विषय निवडला - फुलपाखरू!  पहिली 5 मिनिटं मला काही सुचत नव्हतं. मग खूप विचार आणि शब्दांची जुळवाजुळव करून काही ओळी सुचल्या आणि मी लिहीतच गेले.....कविता संपेपर्यंत.! 

  फुलपाखरू           

एकदा अंगणात विचार करत बसले होते. 
आभाळाकडे मान उंचावून आशेने बघत होते. 
एक तरी कविता सुचू दे मला,
कोमल हातातली दिसू दे कला. 

विषय काही सुचत नव्हता 
झाले होते त्रस्त 
कंटाळा आला होता 
खूप खूप जास्त 

तेवढ्यात डोळ्यासमोरून एक पाकळी उडाली 
झटकन माझी नजर तिच्याकडे वळली 
कोण आहे ते पाखरू मला काही कळेना 
त्यातून मला कवितेची ओळ सुद्धा सुचेना 

पाच-दहा मिनिटातच माझे डोळे चमकले 
कवितेचे विषय झरकन आठवले. 
त्यातलाच एक विषय घेऊन म्हटलं कविता करू,
ठरलंना मग कवितेचा विषय - 'फुलपाखरू' ! 

                                                             

 माझा स्वतः वर विश्वासच बसत नव्हता. याआधी मला कधीच वाटलं नव्हतं की मला इतक्या कमी वेळात एवढी चांगली कविता सुचेल. ( त्यानंतर मी बऱ्याच चांगल्या कविता केल्या ही गोष्ट वेगळी.. पण तेव्हा माझ्यासाठी हीच कविता Best होती.) कविता तर लिहून झाली, पण तिला बक्षीस मिळेल याची काही खात्री नव्हती. कारण कविता फक्त मला आवडून चालणार नाही, ती परीक्षकांनाही आवडायला हवी. पुढे काय होईल या विचाराने जीव नुसता खाली-वर होत होता.   
              
              शेवटी एकदाचे परीक्षक उठले आणि निकाल वाचून दाखवू लागले. पण कविता स्पर्धेच्या विजेत्यांमध्ये माझं नाव कुठेच नव्हतं. मला थोडं वाईट वाटलं. पण मी स्वतःची समजूत घातली. मग परीक्षक पुन्हा कविता स्पर्धेच्या विजेत्यांची नावे वाचू लागले. मला काही कळेच ना! मग एकदम ट्यूब पेटली. स्पर्धेसाठी लहान आणि मोठा दोन गट केले होते! आधीची ३ नावे लहान गटातल्या मुलांची होती. माझा पडलेला चेहरा पुन्हा टवटवीत झाला. आश्चर्य म्हणजे परीक्षकांनी पहिलं नाव माझंच घेतलं. बापरे! कविता लिहायला घेतली तेव्हा अशक्य वाटणारी गोष्ट होती ही! जवळजवळ १५ - २० मिनिटांचा हा काळ; पण तेवढ्या वेळात मी काय काय विचार केला, किती वेगवेगळ्या भावना माझ्या मनात येऊन गेल्या. खरंच, हा अनुभव काही औरच होता. 
                                             
                                                                                      लेखन- ईरा कुलकर्णी         

Wednesday, August 10, 2022

पहिली कविता आणि बक्षीस समारंभ


भाग २ 


पहिली राज्यस्तरीय स्पर्धा.... आणि त्यासाठी लिहिलेली माझी पहिली कविता!! माझ्यासाठी हा खूपच आनंदाचा क्षण होता.कविता लिहून वेळेत जमा केली, पण पुढे त्याचा काय निकाल लागला हे जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक होते.एकीकडे 'पहिल्याच प्रयत्नात बक्षीस मिळेल.या भावनेत वाहून जाऊ नकोस.'असं मनाला समजावत होते आणि दुसरीकडे 'पहिले ३ नंबर नाही पण उत्तेजनार्थ बक्षीस तरी मिळेल मला.'असेही विचार मनात येत होते.मी निकालाची आतुरतेने वाट बघत होते. 
      अखेर तो दिवस उजाडला.ताईंनी ज्या मुलांना बक्षिसं मिळाली आहेत त्यांची नावे सांगितली. त्यात माझेही नाव होते!!
      मग काय, नुसता जल्लोष.माझा आनंद गगनात मावत नव्हता.पहिल्या प्रयत्नात सगळ्यांनाच यश मिळतं असं नाही. पण मला ते मिळालं होतं आणि त्यासाठी मी सर्वात जास्त खुश होते.


बक्षीस समारंभाचा दिवसही माझ्या आयुष्यातला एक भन्नाट दिवस होता.अविस्मरणीय! मलाच अचंबित करणारा.

त्यादिवशी दुपारी माझी होमी भाभाची लेखी परीक्षा होती.ती परीक्षा व्यवस्थित झाली पण तिथून निघायला मात्र मला उशीर झाला.तोपर्यंत बक्षीस समारंभ सुरू झाला होता.मी परीक्षा केंद्रावरून थेट बक्षीस समारंभाला जायला निघाले. मला खूप उशीर झाला होता. तेवढ्यात आयोजकांकडून फोन आला. ते म्हणाले,'तुम्ही येत आहात न,आम्ही तुमच्यासाठी थांबलो आहोत.' ते शब्द मी ऐकले आणि मला हायसं वाटलं.ते माझ्यासाठी थांबले आहेत हे ऐकून माझी भीती,टेंशन आणि अस्वस्थता कमी झाली होती.आम्ही घाईघाईतच तिथे पोहोचलो.ज्या मुलांना बक्षिसं मिळाली होती, त्यांना त्यांची बक्षीसप्राप्त कविता वाचण्याची संधी मिळणार होती.मी पोहोचले तेव्हा सगळ्यांच्या कविता वाचून झाल्या होत्या. मला हे माहीत नव्हते.त्यांनी मला पोहोचल्या पोहोचल्या ही सूचना दिली आणि मी स्टेजवर गेले. एवढ्या मोठ्या स्टेजवर मी एकटी.... समोर खूप मान्यवर आणि इतर बरीच अनोळखी मंडळी बसलेली. का? फक्त माझी कविता ऐकण्यासाठी!१ मिनिट सगळीकडे शांतता पसरली. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि शक्य तितक्या आत्मविश्वासाने आणि खणखणीत आवाजात कविता सादर केली. माझी कविता संपल्यावर झालेला 'तो' टाळ्यांचा कडकडाट मला अजूनही आठवतो.

आता बक्षीस वितरणाची वेळ होती. पुन्हा एकदा माझी धडधड वाढली. माझे कान माझं नाव ऐकायला आसुसले होते.आणि त्या स्पर्धेत मी द्वितीय क्रमांक पटकावला! बक्षीस घेताना मी प्रेक्षकांमधे बसलेल्या माझ्या कुटुंबियांकडे बघितलं.प्रत्येकाचे चेहरे आनंदाने तेजळले होते.त्यांच्या डोळ्यात अभिमान आणि कौतुक काठोकाठ भरलं होतं. आणखीन काय हवं होतं मला! 

पण तो दिवस इथेच संपला नाही. मी बक्षीस घेऊन कितीही समाधानी झाले असले तरी,त्यदिवशीचं मला मिळणारं एक surprise अजून बाकी होतं.

आम्ही त्या हॉलमधून बाहेर पडलो.सगळे आनंदात गप्पा मारत होते.मला समोर राजीव तांबे उभे असलेले दिसले. मी जागच्याजागी थिजले. मी लहानपणापासून ज्यांच्या गोष्टी वाचल्या त्यांना भेटायची संधी मला मिळत होती! मग आम्ही त्यांच्याशी बोललो. मी त्यांना माझी कविता वाचायला दिली.त्यावर ते म्हणाले,"छान केलीस कविता!" बास इतकच. पण माझ्यासाठी तेसुद्धा खूप होतं.मला इतका आनंद झाला की माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं.त्यांच्यासोबत फोटो काढून आम्ही त्यांचा निरोप घेतला.


माझ्या आयुष्यातला 'तो' दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. 


राजीव तांबे कवितेखाली अभिप्राय लिहिताना  

Friday, August 5, 2022

पहिली कविता आणि बक्षीस समारंभ

पहिली कविता आणि बक्षीस समारंभ 

भाग १ 
माझं कवितेसाठी मिळालेलं पहिलं बक्षीस 

वर जी दिसते आहे न , तीच माझी पहिली-वहिली TROPHY.....

याचीच कथा सांगते आज तुम्हाला. 

               तर झालं असं की, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाला १०० वर्षे पूर्ण झालयानिमित्त त्यांनी बालकवी संमेलनाचे आयोजन केले होते. मला याची माहिती अर्थातच शाळेतून मिळाली. "या स्पर्धेत भाग घ्यावा का?" माझ्या मनात संदेह होता, कारण 'कविता' मला अगदी नवखी होती. काही महिन्यांची ओळख होती आमची. अशावेळी तिच्यावर विश्वास ठेवून एवढ्या मोठ्या स्पर्धेत भाग घ्यायचा , हे जरा अवघडच होतं. शेवटी स्पर्धा राज्यस्तरावरची होती. पण मी तयारी दाखवली आणि घरच्यांचाही पाठिंबा मिळाला; स्पर्धेत सहभागी व्हायचं निश्चित झालं. 

                    मग सुरू झाली माझी कसरत . ' विषय काय घ्यावा? ' इथपासून सुरुवात . कविता लिहून शाळेत जमा करायला काही दिवसांचा अवधी दिला होता. मी भाग घ्यायचं ठरवलं तेव्हा कविता लिहायला खूप उत्साही होते. पण एक ओळ सुचेल तर शप्पथ! अखेर शेवटचा दिवस उजाडला. त्यदिवशी मला काहीही करून कविता लिहायची होती. दिवसभर डोक्यात तोच विचार घोळत होता. शेवटी संध्याकाळी मला दोन कडवे सुचले. पण त्यातही अडचण अशी होती की, कविता अजूनही अपूर्ण वाटत होती. मला काय करावं काही कळत नव्हतं. 

                  रात्री जेवण झाल्यावर आई-बाबांसोबत मामाकडे भेटायला जायचे ठरले. तेव्हा माझ्या मनात अर्धवट राहिलेल्या कवितेचा विचार होता, पण मी तेव्हा इतकी बिनधास्त (खरंतर निष्काळजी 😁) होते की, उद्या सकाळी कविता पूर्ण करू, या भरोश्यावर मीसुद्धा त्यांच्यासोबत गेले. तिथे सगळ्या गप्पागोष्टी झाल्या आणि आम्ही उशिराने घरी यायला निघालो. माझ्या मनात पुन्हा कवितेचा विचार सुरू झाला. ( कविता अर्धवट राहिल्यावर अस्वस्थ होण्याची सवय मला तेवहापसूनच लागली बहुतेक.) मी मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करत होते. finally एक भन्नाट कडवं मला सुचलं आणि मी लगेच आई-बाबांना ते ऐकवलं. मला अचानक हे कडवं सुचल्याने त्यांना आश्चर्य वाटत होतं. मी घरी पोहोचल्या-पोहोचल्या माझी वही काढली आणि मला सुचलेलं कडवं लिहून काढलं. घरी पोहोचेपर्यंत मी ते कडवं विसरू नये म्हणून त्याचा जप करत होते. नंतर ती कविता घरात सगळ्यांना दाखवली. दुसऱ्यादिवशी शाळेतल्या ताईंकडे सुपूर्त केली. माझा जीव भांड्यात पडला. आता बक्षीस मिळो अथवा न मिळो . माझी पहिलीच वेळ असल्याने मला कोणत्याही बक्षीसची अपेक्षा नव्हती. कविता लिहून झाल्याचा आनंद मात्र गगनात मावत नव्हता.

                                   लेखन- ईरा कुलकर्णी 

सफर

  Have you experienced this feeling?! Tell me how your journey was in the comments which turned out to be this good :)